जळगाव – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्यावतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहात अभिवादन सभा घेऊन रॅली काढण्यात आली. हरी विठ्ठल नगर बाजार पेठेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख अतिथी प्रा. जयश्री भोसले, प्रा. प्रितीलाल पवार, प्रा. रिना पवार, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बिऱ्हाडे, सरोजिनी लभाणे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अभिलाषा रोकडे यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचा त्याग व समर्पण यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. रमाई यांची वेशभूषा साकारलेल्या आशा सज्जन इंगळे या विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून महिलांनी एकमेकांना केक भरविला. रमाईंची प्रतिमा व वेशभूषेतील विद्यार्थिनीला सुशोभित करण्यात आलेल्या घोडा गाडीत बसवून सजीव आरास काढण्यात आली. आमदार राजुमामा भोळे, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुंजाळ साहेब, सामाजिक कार्यकर्ते कैलास हटकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता वानखेडे, जिल्हा सचिव सुषमा इंगळे, तालुका अध्यक्षा ज्योती दाभाडे, शहर अध्यक्षा राधा जवरे यांनी मिरवणुकीस भेट देऊन रमाईंना अभिवादन केले. महिला व पुरुषांसह लहान मुलांनीही डिजेच्या तालावर नाचत मनमुराद आनंद लुटला. नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार राजुमामा यांनीही तालावर ठेका धरला. हरी विठ्ठल नगर पासून राजीव गांधी नगर ते वाघ नगर जवळील बौद्ध विहारात बुद्ध वंदना घेउन रॅलिची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगल मैत्री ग्रुपच्या विद्या झनके, शोभा इंगळे, शौला, पारधे, उषा इंगळे, प्रमिला इंगळे, उषा तायडे, छाया इंगळे, शोभा पाटोळे, उज्वला सपकाळे तसेच परिवर्तन मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.